Sunday, December 07, 2008

बा हळव्या मना

एखादी गोष्ट मनाला लागते
म्हणजे नक्की काय होतं ?
द्रुष्टी देखल्या सत्याचा स्वीकार करणं
मन नाकारीत रहातं; असंच ना ?

वेड्या मनाला समजत नाही
की आभाळी रणरणत्या सूर्याला
हट्टानं चांदोबाच म्हणून
कुणी त्या ' चांदण्या ' त भटकू गेलं
तरी घाम निथळल्यावाचून का राहील ?

अश्रू म्हणजे तरी काय ?
सत्यसूर्याच्या दर्शनतेजानं
मनातून निथळणारा घामच की !

खोट्या कल्पनांत रमून
सत्य नाकारण्यापरीस
वेळीच त्याचा स्वीकार केला
तर निदान जखमेवर
औषध तरी शोधता येतं.....
सेप्टीक होण्यापूर्वीच !

अंगणांतला भक्कम वृक्ष
डोळ्यादेखत वठला
म्हणून अश्रू गाळत रहायचं
अन्‌ आसपास अंकुरणार्‍या
कोवळ्या रोपांना अव्हेरत रहायचं......
मग तीही सुकून गेल्यावर
अधिकच कष्टी व्हायचं
यात काय अर्थ?

खुळ्या माणसा,
दोन्ही डोळे उघडे ठेवून
जग पहायला शीक !

अरे, अंधारातून प्रकाशात येताना
आधी डोळे दिपणारच !
पण म्हणून, भेकड बनून
कायमचे का मिटून घ्यायचे असतात ते ?

No comments: